मुंबई - मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करता यावे, यासाठी पीएपीच्या सदनिका दिल्या जातात. अशा सदनिकांची संख्या कमी असल्याने भांडुप आणि मुलुंडमध्ये ९ हजार सदनिका ( Bhandup And Mulund PAP House ) बांधून घेतल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव घाईघाईने मंजूर केल्याने त्यात भ्रष्टाचाराचा वास येत असून तब्ब्ल ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja Alligation On PAP House ) यांनी केला आहे. तर यात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी स्पष्ट केले आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप -
मुंबई महापालिकेची अनेक विकास कामे सुरु आहेत. या विकास कामात अडथळा येणारी अनेक बांधकामे पाडावी लागतात. अशा विस्थापितांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करावे लागते. या विस्थापितांना पालिकेकडून पीएपीची घरे दिली जातात. मात्र, पीएपीची घरे कमी असल्याने पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी पालिकेने मुलुंडमध्ये ७४३९ व भांडुपमध्ये १९०३ घरे उभारली जाणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव काल गुरुवारी मंजुरीसाठी पालिकेच्या सुधारसमितीमध्ये मंजुरीसाठी आला असता, तो आज कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आला. यावेळी कोणालाही बोलू दिले नाही. ही कुठली लोकशाही आहे, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. हा भूखंड दवाखाना, हॉस्पिटल, मैदान यासाठी राखीव आहे. सरकारने त्याचे आरक्षण बदललेले नाही. मग घाई गडबड कोणासाठी, ही संशयाची गोष्ट असून यात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे -
काँग्रेसने केलेल्या आरोपावर बोलताना, पालिकेची ७ परिमंडळ आहेत. प्रत्येक परिमंडळमध्ये १० हजार पीएपीची घरे बांधण्याचा निर्णय पालिका आणि सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुलुंड येथे ७४३९ तर भांडुप येथे १९०३ घरे बांधण्याचा प्रस्ताव आज आला होता. सभा ऑनलाईन असल्याने कोण काय बोलत होते, हे काहीच ऐकायला येत नव्हते. त्यातच हा प्रस्ताव पुकारला कोणी काहीच बोलले नाही म्हणून प्रस्ताव मंजूर केला. सदनिका बांधणाऱ्या विकासकाला ४० टक्के टीडीआर आणि ६० टक्के क्रेडिट नोट देत आहोत. क्रेडिट नोटमुळे विकसकाचा पैसे पालिकेकडे जमा राहणार आहे. त्यामधून त्याचे कर पालिका वसूल करणार आहे. बाजार भावापेक्षा कमी दराने घरे बांधून मिळणार आहेत. यामुळे करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत.
हेही वाचा - Rajesh Tope on Health Paper Exams : 'आरोग्य विभागाच्यावतीने घेतलेली परीक्षा पध्दत चुकीची'