मुंबई : राज्यात संचारबंदीला सुरूवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासोबत एक महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनास काही महत्वाचे निर्देश दिले जाऊ शकतात असे सूत्रांकडून समजते आहे.
सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत संचारबंदीच्या नियमावलीशी संबंधित काही महत्वाचे निर्देश मुख्यमंत्री प्रशासनास देतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. राज्यात आज रात्री आठ वाजेपासून संचारबंदीला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्री आठ वाजेपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार गरजुंना मदत देण्यासोबत काही निर्बंध राज्य सरकारने घातले आहे.
- अधिकृत/नोंदणीकृत फेरीवाले, घर कामगार, बांधकाम मजूर, रिक्षा चालक, आदिवासी यांना अर्थ सहाय्य राज्य सरकारकडून करण्यात येईल.
- सरकारच्या विविध योजनेच्या सुमारे 35 लाख लाभार्थ्यांना 1 हजार रुपये निधी आगाऊ देणार
- रस्त्यावरील खाद्य विक्रेते पार्सल सुविधा सुरू ठेवू शकणार
- हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार केवळ होम डिलिव्हरी सुरू राहणार
- निवासी आणि प्रवासाची सोय असेल तर बांधकाम सुरू ठेवता येणार
- बँक, शेअर बाजार, पेट्रोल पंप, औषध दुकान, दवाखाने सुरू राहणार
- लोकल, बस सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार
- अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे 1500 रुपये
- 12 लाख संख्या असलेल्या रिक्षा चालकांना 1500 रुपये
- आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब 2000 रुपये
- संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यांची संख्या 35 लाख आहे.
- गरिबांना मोफत धान्य
- प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देणार
- नोंद केलेल्या लाभार्थ्यांची संख्या 7 कोटी आहे.
- 7 कोटी नागरिकांना एक महिना मदत
- शिवभोजन थाळी आता पुढील एक महिना मोफत देणार आहोत.
- पुढील पंधरा दिवस राज्यात संचारबंदी.
- कोरोनाविरोधात लढणाऱ्यांना मदत करण्याचे मुख्यमंत्र्याचे नागरिकांना आवाहन.
- अत्यावश्यक सेवे सोडून इतर सर्व बंद.
- सकाळी 7 ते रात्री 8 या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.
- रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सेवा , मास्क उत्पादक दुकाने आदी सुरू राहतील.
- पत्रकारांना जाण्या-येण्याची सूट
- अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद.
- आज संध्याकाळपासून ब्रेक द चेनसाठी राज्यात 144 कलम लागू.