मुंबई - ईडीच्या धाड सत्रांमुळे अडचणीत आलेल्या भावना गवळी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. खासदार गवळी वर्षा बंगल्यावर पोहचल्या. मात्र, मुख्यमंत्री कार्यक्रमात असल्याचे सांगत अर्धा तास त्यांना बंगल्याबाहेर उभे करण्यात आले. त्यानंतरही कोणताही निरोप न आल्याने त्या माघारी फिरल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- गवळींना 'वर्षा'वर नो एन्ट्री -
हेही वाचा - शरद पवारांची दिशाभूल करणाऱ्या भावना गवळींपासून माझ्या जीवाला धोका - हरीश सारडा
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. परिवहन मंत्री अनिल परब, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्यासह अनेकांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. गवळी यांना ईडीने समन्सही बजावले आहेत. या पार्श्वभूमीवर आज गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थान गाठले. मात्र, मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडून गवळी यांना भेटण्यास नकार देण्यात आल्याचे समजते.
- भावना गवळींना ईडीचा समन्स -
खासदार गवळी यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. ईडीमार्फत गवळी यांची चौकशी सुरू आहे. ईडीने गवळी यांना समन्सही बजावले आहेत. देगाव येथील बालाजी पार्टिकल, रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेडची चौकशी करण्यात आली. शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशीही सुरू आहे.
हेही वाचा - 'या' शिवसेना नेत्यांवर तपास यंत्रणेचा ससेमिरा; नेत्यांच्या चौकशीमुळे ठाकरे सरकारची प्रतिमा मलीन?