मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणुकीपूर्वी आणि आता निवडणुकीदरम्यान चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात प्रचार करणारे युतीचे उमेदवार मनोज कोटक यांना रॅली दरम्यान माहुलवासीयांनी घेराव घातला. अखेर स्थानिकांचा तीव्र विरोध पाहता कोटक यांनी काढता पाय घेणे पसंत केले.
मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रदूषणयुक्त माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या विभागात रिफायनरी प्रकल्प असल्याने प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. प्रदूषणामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना त्वचेचे व श्वसनाचे आजार झाले आहेत. विविध आजारांमुळे गेल्या एक ते दीड वर्षात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. माहुलवासियांना प्रदूषण नसलेल्या इतर ठिकाणी हलवावे असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यापोटी दरमहा भाडे आणि डिपॉझिट देण्याचेही न्यायालायने आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने आंदोलन-
उच्च न्यायालयाच्या आदेशाची भाजप सरकारकडून अंमलबजावणी केली जात नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी तानसा पाईपलाईन येथे आंदोलन सुरु केले आहे. त्याकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्याने माहुलवासीय संतप्त झाले आहेत. घाटकोपरपूर्वेकडील शास्त्रीनगर परिसरातील ओएनजीसी कॉलनीत बुधवारी सायंकाळी कोटक यांची पदयात्रा सुरू होती. यावेळी माहुलवासियांनी रॅली अडवत त्यांना घेराव घातला.
रॅली दरम्यान स्थानिक नागरिकांसह माहुलवासियांनी आजपर्यंत तेथील समस्या सोडविला नसल्याचा आणि त्यांना रस्त्यावर आणल्याचा आरोप केला. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. मात्र स्थानिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा जाब या नागरिकांनी विचारला. यावेळी छेडांसह कोटक यांनी त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांचा तीव्र विरोध पाहून कोटकांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी भाजपचे प्रवीण छेडा, पराग शाह, खासदार किरीट सोमय्यांसह शिवसेनेचे कार्यकर्तेही हजर होते.