मुंबई - दक्षिण मुंबईतील काही भागातील मलवाहिन्यांची गेल्या वीस वर्षापासून साफसफाई झालेली नसल्याने या मलवाहिन्या 50 टक्के गाळाने भरल्या आहेत. या वाहिन्यांची साफसफाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेला सुमारे 8 कोटी 10 लाख 59 हजार रुपये इतका खर्च येणार ( BMC Spend 8 Crore ) आहे. या कामामुळे गटाराच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले ( South Mumbai Sewerage Cleaning By BMC ) आहे.
वीस वर्षांनी मलवाहिन्यांची सफाई - मलवाहिन्यांची जीआरपी लायनिंग पद्धतीने पुनर्बांधणी करण्यात आली आहे. ही पुनर्बांधणी सन 2001 ते 2004 या कालावधीत करण्यात आली आहे. 'पॉवर बकेट' या यंत्रसामुग्रीद्वारे जीआरपी लायनिंगची साफसफाई करता येत नाही. तसेच मनुष्यबळ प्रवेश करून मलवाहिन्या साफसफाई करण्यास बंदी आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड, सरदार वल्लभाई रोड, पटेल खेतवाडी रोड, मौलाना शौकत अली रोड आदी विभागातील मलवाहिन्या साफसफाई करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या वीस वर्षापासून या वाहिन्यांची साफ-सफाई रखडल्याने मलवाहिन्यांमध्ये गाळाचे प्रमाण वाढले आहे.
मलवाहिन्यांचे 2026 किलोमीटरचे जाळे - मलवाहिन्यांच्या गाळामध्ये प्लॅस्टिक कपडे, चिंद्या, झाडांच्या फांद्या अडकल्या असल्यामुळे गाळ काढणे शक्य होत नाही. पालिकेकडे सध्या असलेल्या सक्शन कम जेटिंग मशीन या सहाशे मिलिमीटर व्यासापर्यंतच्या मलवाहिन्यांची साफसफाई करण्यासाठी सक्षम आहेत. त्यापेक्षा मोठ्या मलवाहिन्यांमधील गाळ उपसण्यासाठी या मशीन उपयोगी ठरत नाहीत. त्यामुळे पालिकेने सक्शन कम जेटिंग रिसायकलिंग मशीन व जास्त क्षमता असलेल्या सुपर सकर मशिनद्वारे गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत अंदाजे 2026 किलोमीटर लांबीच्या विविध व्यासाच्या मलवाहिन्यांचे जाळे आहे. या वाहिन्यांमध्ये मनुष्य प्रवेश करू शकत नाही. अशा 900 मिलिमीटरपेक्षा जास्त व्यासाच्या 138 किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या आहेत. या मलवाहिन्या वेळोवेळी सफाई करणे शक्य होत नाही.