मुंबई - अनेक वेळा मागणी करुनही महाराष्ट्र सरकार देवस्थाने सुरु करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे यासंबंधी विचार-विनिमय करण्यासाठी आज व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक-आध्यात्मिक संघटना, संस्था, देवस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त आणि पंथ- संप्रदायांच्या प्रमुख धर्माचार्यांची, भाजप अध्यात्मिक आघाडीची बैठक झाली. त्यात सरकार मंदिर सुरू करत नसल्याने भाजप अध्यात्मिक आघाडी व सर्व मंदिर प्रशासन विश्वस्त 29 ऑगस्टला घंटानाद आंदोलन करणार आहेत.
आज झालेल्या भाजप अध्यात्मिक आघाडीचा बैठकीत डाॅ. सुरेश हावरे , अध्यक्ष साईबाबा संस्थान, शिर्डी, महेश जाधव, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, अध्यश विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर. अतुल भोसले, माजी अध्यक्ष,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर. सुमंत घैसास , विश्वस्त , श्रीसिद्धिविनायक मंदिर , मुंबई, खा. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, विरशैव लिंगायत संप्रदाय, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, विश्वस्त, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर , ह.भ.प.प्रकाश महाराज जवंजाळ, विश्वस्त, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर., ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.वारकरी मंडळ, महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, कोषाध्यक्ष, अ.भा. संत समिती, पंडित सतिष शंकर शुक्ल ,राष्ट्रीय उपाध्यक्ष,अ.भा. पुरोहित संघ, सुदर्शन महाराज कपाटे, प्रतिनिधी, महानुभाव पंथ, गुरुमुख जगवानी, राष्ट्रीय प्रमुख, सिंधी ग्लोबल ट्रस्ट, गुरुप्रितसिंग सोखी , प्रतिनिधी, हुजूर साहेब गुरुद्वारा, नांदेड, भुषण कासलीवाल , प्रतिनिधी, जैन संघटना हे उपस्थित होते.
आज भाजपचा अध्यात्मिक आघाडीचा झालेल्या बैठकीत चर्चा झाली, की गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे भाविक समाज मानसिकदृष्या खचलेला आहे. या समाजाला आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अपरिहार्य आहे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करणे बाबत ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात माॅल, मांस, मदिरा चालु झाले आणि देवस्थाने मात्र बंद आहेत. त्यामुळे सरकारला वारंवार मागणी करून देखील कोणतेही प्रकारचा प्रतिसाद हे सरकार देत नाही .
राज्यात वाईट म्हणजे दारु पिणारे आनंदात फिरत आहेत. तर भजन-पूजन करणारे भाविक भक्त यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत आहे. आस्थेबरोबरच, तिर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे जीवन व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत. त्यामुळे त्वरित मंदिर उघडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अशी सर्व मंदिर प्रशासन ,भाजप अध्यात्मिक आघाडी, आणि भाविक करत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत महाराष्ट्रातले मविआ सरकार मंदिर उघडण्याची मागणी अजूनही मान्य करत नाही. म्हणून कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या या "ठाकरे सरकार"ला इशारा देण्याकरिता 9 ऑगस्टला घंटानाद करत आंदोलन करण्याचे ठरले आहे, असे आचार्य तुषार भोसले, संयोजक, आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.