मुंबई - महसुलात घट झाल्याने मुंबईचा विकास खुंटल्याची टीका भाजपचे मनपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे. हा अर्थसंकल्प उदासीन असून यामध्ये आकड्यांचा फुगवटा असल्याची टीका त्यांनी केली. मुंबईकरांवर नवे कर लावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आम्ही विरोध करू, असा इशारा त्यांनी दिला. 2020-21चा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेला दिवाळखोरीकडे नेणारा आणि मुंबईकरांचे कंबरडे मोडणारा असल्याची टीका यावेळी भाजपने केली.
महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांनी सादर केला. 33 हजार 441.02 कोटींच्या या अर्थसंकल्पामुळे सेवाशुल्काच्या नावाखाली सक्तीची वसुली सुरू होणार आहे, असे ते म्हणाले.
मुंबईमधील वृक्षतोडीच्या प्रकरणाबाबत बोलताना, शिवसेनेची कथनी आणि करणीत फरक असल्याचे ते म्हणाले. 25 हजार झाडे तोडण्यासाठी मंजुरी देणारी शिवसेना वृक्ष तोडीसाठी मेट्रोच्या मुळावर का येते, याचे स्पष्टीकरण शिवसेनेने करावे, असे शिरसाट म्हणाले. मुंबईत विकास कामे सुरू असताना त्याआड येणारी झाडे कापणार, की विकास कामांना स्थगिती देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कर नव्हे; तर सेवा शुल्काचे गोंडस नाव देऊन अतिरिक्त करवाढ करण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला. या नवीन करांमुळे मुंबईकरांचे निश्चित कंबरडे मोडणार असल्याचे शिरसाट म्हणाले.