मुंबई - दरवर्षी गोविंदा पथके 'दहीकाला उत्सव' मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे या उत्सवावर विरजण पडले आहे. भारतातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमदार राम कदम यांच्या लक्षवेधी दहीहंडीची दरवर्षी सर्वत्र चर्चा असते. मात्र, यंदा कदम यांनी आगळीवेगळी दहीहंडी उत्सव साजरा करत कोरोना महामारीतून भारत मुक्त व्हावा या संकल्पनेतून प्रतिकात्मक दहीहंडी उत्सव साजरा केला आहे.
घाटकोपरच्या श्रेयस सिनेमा येथील चौकात हा दहीहंडी उत्सव साजरी केला असून या प्रतिकात्मक दहीहंडी उत्सवातून कोरोनामुक्त भारत आणि चिनी वस्तूवर बहिष्कार ही संकल्पना ठेवण्यात आली होती. यावेळी कृष्णा आणि राधाच्या वेशात असलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात आली.
हेही वाचा - ठाकरे सरकारचा कोकणी माणसांवर कसला राग?
'श्रीकृष्ण जन्म उत्सव असताना कोरोनामुळे आजच्या दहीहंडी उत्सावर निर्बंध आले, सरकारने दिलेल्या नियमांच्या आधीन राहून दहीहंडी साधेपणाने साजरी करा. देशात आपला भारत देश कोरोनामुक्त व्हावा आणि आपण सर्वांनी मिळून चिनी वस्तूवर बहिष्कार टाकावा या संकल्पनेतून दहिहंडी उत्सव साजरा करा'. असे आवाहन आमदार राम कदम यांनी यावेळी केले आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: एक शाळा अशीही जिथे मागील ४ वर्षांपासून दिले जातात ऑनलाइन शिक्षणाचे धडे..