मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांंची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) भ्रष्टाचार प्रकरणात झाडाझडती केली जात आहे. मात्र, चौकशीचे समन्स बजावूनही देशमुख त्याला प्रतिसाद देत नसल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे. अटक होईल यामुळे चौकशीला देशमुख बगल देत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट' नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड
ईडीने आज देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, संबंधित गुन्ह्यांची माहिती मिळावी, असे पत्र अनिल देशमुख यांनी ईडीला लिहिले आहे. अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता कमी आहे. ईसीआयआरची कॉपी देण्यात यावी, जी कागद पत्र हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे ईडीला अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे, अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात येण्याची शक्यता कमी आहे.
५ वेळा समन्स, संपत्ती जप्त
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. अनिल देशमुख यांना आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावण्यात आले. तरीही देशमुख चौकशीला जाण्याचे टाळत आहेत. देशमुख यांच्या पत्नी व मुलालाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे.
काय आरोप आहे देशमुखांवर
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तसेच, अनिल देशमुखांवर ते अनेक अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या बदल्या भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप करण्यात आला आहे.
याचिकाही फेटाळल्या
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या याचिका फेटाळल्यामुळे देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात कुठलाही दिलासा मिळालेला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे चौकशी सुरू राहणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिल देशमुखांप्रकरणी सीबीआय तपास कायम राहणार आहे.
देशमुखांना अखेर राजीनामा द्यावा लागला
अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रिपद आल्यापासून ते सतत वादात अडकले होते. आधी सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरण आणि नंतर अँटिलिया स्फोटक, मनसुख हिरेन आत्महत्या आणि सचिन वाझे प्रकरणात देशमुख यांना कठोर आणि खंबीर भूमिका घेता आली नाही. त्यामुळे, प्रत्येक प्रकरणात देशमुख हे विरोधकांच्या रडारवर राहिले. मनसुख हिरेन प्रकरणानंतर थेट पोलीस आयुक्तांच्या आरोपामुळे देशमुखांना पक्षाची बदनामी झाल्याने अखेर राजीनामा द्यावा लागला.
देशमुखांची अटक अटळ- विरोधक
अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावून देखील ते आपल्याला अटक होईल या कारणास्तव गैरहजर राहात आहेत, असे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी याप्रकरणी म्हंटले आहे. तसेच, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना अटक होणारच. पैसे खाल्ले आहेत तर अटक तर होणारच ना, असे देखील सोमय्या यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा - दरवर्षी पाण्याची पातळी मोजत रहायचे का? कायमस्वरूपी तोडग्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील-मुख्यमंत्री