मुंबई - देशात हवा प्रदूषणामध्ये दिल्लीनंतर मुंबईचा नंबर लागतो. मुंबईत पुन्हा हवेचा स्तर घसरला ( Mumbai air index level come down ) आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून मुंबईची नोंद झाली आहे. शहराच्या कुलाबा आणि माझगाव या भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी खालावला. माझगावमध्ये 317 तर कुलाब्यात 313 निर्देशांक नोंदवला आला. त्यामुळे दिवसभर मुंबईतील अनेक भागात प्रदुषित धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. आज मात्र हवेच्या गुणवत्तेचे काही प्रमाणात सुधारणा झाली आहे.
वायून प्रदूषण वाढण्याची शक्यता -
आज कुलाबा येथे हवेचा निर्देशांक 173 नोंदविण्यात आले आहेत. मात्र माझगाव येथे 262 निर्देशंक नोंदविण्यात आला, आजचे हवेचे गुणवत्ता निर्देशांक समाधान कारक असले तरी येणाऱ्या काळामध्ये हवेची गुणवत्ता ढसळू शकते. सफर या हवेच्या गुणवत्ता दर्शवणाऱ्या संस्थेने मुंबईत वायू प्रदूषण वाढल्याची नोंद केली आहे. दरम्यान मुंबईत हवेचे प्रदूषण वाढले आहे. हवेची अशी स्थिती राहिल्यास श्वसनाचे आजार असलेल्यांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
थंडीत का घसरते हवेची गुणवत्ता -
सध्या वातावरणात गारवा जाणवत आहे. अशा काळात जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. त्यामुळे धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात. परिणामी प्रदूषणाची पातळी वाढू लागते तर हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी खालावते.
वाईट हवेचा आपल्या जीवनावर परिणाम -
वृद्ध आणि मुले यांना याचा जास्त फटका बसतो. शिवाय, सह-व्याधी, हृदयरोग, कर्करोगाचे रुग्ण, कोविड रूग्ण आणि सीओपीडी रुग्णांना जास्त धोका असतो. गंभीर लोकांव्यतिरिक्त, निरोगी लोकांना डोळ्यांमध्ये खाज सुटणे, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी उद्भवतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणं गरजेचे आहे. आजारी असलेल्या व्यक्तींनी वेळेवर जेवण करणे, औषधे घेणे, चांगले आणि प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे.
हेही वाचा - PM Modi Kashi Tour Midnight : पंतप्रधानांनी मध्यरात्री केली 'बनारस की गलियोंकी सैर'; पाहा व्हिडिओ