मुंबई - राज्यात विद्यापीठांसाठी एकच कायदा असला तरी परीक्षांबाबत मात्र तो कायदा पाळण्यासाठी सर्व विद्यापीठांनी पळवाटा शोधल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट टळल्यानंतर देखील या सर्व विद्यापीठांमध्ये एकाच काळात परीक्षा घेण्याचे आणि निकाल लावण्याचे आव्हान असणार आहे. मात्र, आजपर्यंतचा इतिहास पाहता हे नियोजन बिघडण्याची शक्यता अधिक आहे. उच्च शिक्षण विभागच याबाबत मोठ्या संभ्रमावस्थेत सापडला असून विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील परीक्षांचा मेळ कसा घालायचा, हे मोठे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे. परिणामी विद्यार्थ्यांची चिंता वाढण्याची शक्यता देखील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत; विद्यार्थी, प्रशिक्षित तरुण आणि पालकांवर होणार परिणाम
विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या परिक्षांचा मेळ घाण्यासाठी शिक्षण विभागकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना तरिही...
राज्यातील विविध विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील परीक्षा या साधारण मार्च-एप्रिलमध्ये सुरू होतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट राज्यापुढे उभे आहे. त्या कारणास्तव या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे राज्यातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालय यांच्या द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा हिशोब राज्यात कुठेही एकसारखा असल्याचे दिसत नाही. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा कशा घ्याव्यात, यासाठी शिक्षण विभागाने चार कुलगुरू आणि दोन संचालकांची एक समिती काही दिवसांपूर्वीच स्थापन केली आहे. मात्र, नेमणुक झाली असली तरी अद्याप या समितीचा थांगपत्ता नसल्याने एकंदरीत परीक्षांच्या नियोजनाविषयी मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
एकट्या मुंबई विद्यापीठात मानव्य विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखांच्या मिळून ७५९ परीक्षा घेतल्या जातात. याहून थोडी अधिक संख्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आहे. उर्वरित विद्यापीठांमध्येही लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुंबई विद्यापीठाकडून कला, वाणिज्य, विज्ञानसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सेमिस्टर एक आणि सेमिस्टर पाच व सहाच्या परीक्षा घेतल्या जातात. उर्वरित सर्व सेमिस्टरच्या परीक्षा संबंधित महाविद्यालयांकडून घेतल्या जातात. तर काही विद्यापीठांमध्ये एक ते चार सेमिस्टर तर काही विद्यापीठे ही सर्वच परीक्षा घेतात. एकाही विद्यापीठाचा दुसऱ्या विद्यापीठांशी परीक्षेच्या संबंधात ताळमेळ नाही. यामुळे सरकारने नेमलेली समिती काय ठरविते याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.
विविध संघटना आणि जाणकारांकडून सरकारला दिले मोलाचे सल्ले...