मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून अजूनही सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. तर 66 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मिळालेल्या मृतदेहांपैकी 30 जणांची ओळख पटली आहे. तर ओळख न पटलेल्या मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा - चितेवरून अचानक उठून बसला मृतदेह, स्मशानभूमीत गोंधळ
पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून, आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
- डायव्हर्सकडून खोल समुद्रात शोधमोहीम सुरू
बचावकार्यासाठी भारतीय नौदलाकडून समुद्रात खोलवर जाऊन कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. यासाठी भारतीय नौदलाच्या 'आयएनएस मकर'ची मदत घेतली जात आहे. या शोध व बचावकार्यासाठी आयएनएस मकर व आयएनएस तरासाचे डायव्हर्स काम करत आहेत.
- पी 305 बार्जचा कॅप्टन राकेश बल्लव अजूनही बेपत्ता
पी 305 बार्जवर काम करणाऱ्या मुस्तफिजुर रहमान शेख यांच्या तक्रारीवरुन बार्जचा कॅप्टर राकेश बल्लव याच्याविरोधात येलोगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. कॅप्टन राकेश बल्लव हा अद्यापही नौदलाच्या बचाव व शोध मोहीम कामादरम्यान आढळून आलेला नसून सध्या तो बेपत्ता आहे.
- मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी - मुंबई पोलीस
दुर्घटनेतील 66 कर्मचाऱ्यांचे मृतदेह मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. त्यापैकी 31 मृतदेहांची ओळख पटलेली आहे, 28 मृतदेह संबंधित नातेवाईकांना देण्यात आले आहेत. अजूनही काही जणांची ओळख पटत नसल्यामुळे त्यांचे डीएनएचे नमुने घेतले जात असल्याची माहिती मुंबईचे पोलीस उपायुक्त एस चैतन्या यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'अजित पवार म्हणजे सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को'
दरम्यान, अलिबाग आवास समुद्रकिनारी याआधी चार मृतदेह सापडले होते. आज अजून एक मृतदेह सापडला आहे. मृतदेह सापडलेला व्यक्ती पी 305 बार्जमधील कर्मचारी असल्याची शक्यता आहे. यासंदर्भातली माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने ओएनजीसी कंपनीला दिली आहे.