मुंबई - कोरोनाच्या संभाव्य रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मुंबई आणि ठाण्यात सुमारे 14 हाजर घरे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा आणि एसआरएची ही घरे असून, गरज पडल्यास आणखी 10 हजार घरे उपलब्ध करून देऊ असेही त्यांनी सांगितले.
क्वारंटाईनसाठी जागेची गरज असल्याने सरकारने म्हाडा आणि एसआरएकडे घरांची मागणी केली आहे. त्यानुसार आज आव्हाड यांनी सोशल डिस्टन्सींग ठेवत गृहनिर्माण खात्याच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई बोर्डाचे अध्यक्ष राधाकृष्ण हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आव्हाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत गृहनिर्माण खाते काय काम करू शकते, याचा आढावा घेतला. त्यानुसार मुंबई आणि ठाण्यात 14 हजार घरे उपलब्ध असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. एसआरएचे पीएपीची 980 घरे, इतर 2138 घरे, वसई-ठाणे 318 घरे इतकी घरे क्वारंटाईनसाठी उपलब्ध करून दिली जातील. तर म्हाडाची ठाण्यात 500,इतर 800, नायगाव 5000, श्रीनिवास मिल 728 घरे आहेत.