मुंबई - राज्यभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून त्यांच्या फटका एसटी महामंडळाला बसत आहे. एसटी महामंडळात गेल्या १२ दिवसात तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. १ एप्रिलपर्यत एसटीत ११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ७ तारखेपर्यत हीच संख्या १२८ झाली होती. १२ एप्रिलला मृतांची संख्या १३८वर पोहोचली आहे. सोमवारी एसटीतील ६८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत.
१३८ एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू -
गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची,विद्यार्थी,मजुरांची वाहतुक एसटीने केली. त्यानंतर आता राज्यात एसटीची वाहतुक पुर्ण क्षमतेने १८ सप्टेंबर २०२० पासून सुरु करण्यात आली होती. दररोज सुमारे ७ लाख प्रवासी राज्यात एसटीने प्रवास करत आहेत. एसटीत कोरोनाबाधिक कर्मचाऱ्यांची संख्या देखील दिवसाला वाढते आहे. आत्तापर्यत तब्बल ५ हजार ७३९ झाली आहे. त्यापैकी ४ हजार ७९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८०७ कर्मचारी-अधिकारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. १३८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल रोजी तब्बल ८१ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात नाशिक मधील १८ तर उस्मानाबादच्या १७ जणांचा समावेश होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच एसटीत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. आत्तापर्यत नाशिकमधील १३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयातील २२ कोरोनाग्रस्तांपैकी ११ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.६ जणांनी आपला जीव गमावला आहे.
आर्थिक मदत नाहीच -
एसटी महामंडळाकडून कोरोना काळात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावल्यास त्याच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती. मात्र, फक्त चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक अशा कर्मचाऱ्यांचा आर्थिक मदत देण्यात आली आहे. ईतर कर्मचाऱ्यांचा मात्र विचार झालेला नाही. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीही देण्यात येणार आहे. अद्याप त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मृतांमध्ये चालक-वाहकांची संख्या मोठी आहे. आत्तापर्यत केवळ ८जण आर्थिक मदतीकरिता पात्र ठरले आहेत.