कोल्हापूर - उद्यापासून राज्यभरातील नाट्यगृहे पुन्हा एकदा सुरू होत आहेत. कोरोनामुळे तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ राज्यभरातील नाट्यगृहे बंद होती. याबाबत गेल्या महिनाभरापासून राज्यभरातील नाट्यकर्मी रस्त्यावर उतरले होते. मात्र, राज्य सरकारने उद्या, शुक्रवार (22 ऑक्टोबर) पासून नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी दिल्याने नाट्यकर्मींकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आणि केवळ 50 टक्के बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट...
- नाट्यगृहे बंद असल्याने नाट्यकर्मीं आर्थिक संकटात :
दीड वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून राज्यभरातील नाट्यगृह बंद होती. त्यामुळे नाट्यगृह आणि या व्यवसायावर अवलंबून असलेले सर्वजण मोठ्या आर्थिक संकटात होते. याबाबत वारंवार नाट्यकर्मींनी आंदोलने करत नाट्यगृहे सुरू करण्याबाबत प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. काही ठिकाणी तर कला बाजारच मांडत नाट्यकर्मींनी आपल्या व्यथा शासनाकडे मांडल्या होत्या. याचीच दखल घेत आणि कोरोनाचा प्रादुर्भावसुद्धा कमी आल्याने उद्यापासून राज्यभरातील नाट्यगृहे आता सुरू होणार आहेत. नुकताच याबाबत शासनाने निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
- केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या आनंदोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन :
दरम्यान, शासनाने नाट्यगृहे उघडण्याची परवानगी दिल्याने कोल्हापुरातील नाट्यकर्मींकडून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे उद्या दुपारी चार वाजता ताल, सूर आणि लय अशा त्रिवेणी संगमाचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रंगकर्मी आंदोलनामध्ये आणि कला बाजार मध्ये सहभागी असणारे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये गायन, वादन, नाटक आणि नृत्य अशा भरगच्च कलांचे कलाकार सादरीकरण करणार आहेत. यासाठी केवळ निमंत्रित व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे होणार पालन :
कोरोनाचा प्रदूर्भार जरी कमी झाला असला तरी संभाव्य धोका ओळखून राज्यशासनाने सर्व नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शिवाय केवळ 50 टक्के उपस्थितीमध्येच कार्यक्रम करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार येथे योग्य व्यवस्था आणि खबरदारी घेतली जाणार आहे.
- 21 नोव्हेंबर रोजी भरत जाधव यांच्या नाटकाने जंगी सुरुवात :
दरम्यान गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले नाट्यगृहे सुरू होत असल्याने राज्यभरातील अनेक गाजलेली नाटके आता पुन्हा होणार असून येत्या 21 नोव्हेंबर रोजीपासून अभिनेते भरत जाधव यांचेही नाटक होणार आहे. त्यामुळे सर्वत्रच आनंदाचे वातावरण असून आता कोरोनाचा प्रादुर्भाव असाच कमी होत जगातून नष्ट व्हावा अशी प्रार्थना सुद्धा नाट्यकर्मींनी केली आहे.
हेही वाचा - राज्यातील नाट्यगृह पुन्हा सुरु होणे हा नव्या पर्वाचा आरंभ - डॉ. नीलम गोऱ्हे