कोल्हापूर - गोव्यात भाजपची एकहाती सत्ता (Goa BJP) येईल आणि 22 प्लसचा नारा भाजप पूर्ण करेल, असा विश्वास गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर (Manohar Ajgaonkar in Kolhapur) यांनी व्यक्त केला आहे. तसेच आप आणि तृणमूलचा आम्हाला फायदाच होणार असून, त्यांचा सुफडासाफ होईल, असेही ते म्हणाले. तर उत्पल पर्रिकरांच्या बंडखोरीचा काहीच परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मनोहर आजगावकर हे आज अंबाबाई दर्शनासाठी (Manohar Ajgaonkar Ambabai Darshan) कोल्हापुरात आले होते. गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला (Goa Election 2022) लागणार आहे.
निवडणूक जिंकण्यास अंबाबाईचे आशीर्वाद महत्त्वाचे -
गोवा निवडणुकीनंतर मनोहर आजगावकर हे आज पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले, तसेच गोवा निवडणुकीत भाजप जिंकण्याचे साकडे अंबाबाई चरणी त्यांनी घातले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणूक जिंकण्यास अंबाबाईचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. अंबाबाईच्या आशीर्वादानेच आम्ही पुढे जाणार आहोत. तसेच गोव्याचे निकाल हाती आल्यानंतर कळेलच भाजप गोव्यात १००% सत्ता स्थापन करेल, 22 जागांवर भाजपचा विजय निश्चित असून, जास्तीच्या निवडून आलेल्या जागा या भाजपसाठी बोनस असणार आहेत, असा विश्वास मनोहर आजगावकर यांनी व्यक्त केला आहे.
उत्पल पर्रीकरांच्या बंडाचा भाजपलाच फायदा -
आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचा आम्हाला फायदाच होणार आहे. त्यांचा सुफडासाफ होईल, मात्र यामुळे काँग्रेसची मते कमी होणार असून, याचा फायदा आम्हाला होईल. तसेच उत्पल पर्रीकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपची मते भाजपलाच मिळतील, असा विश्वासही मनोहर आजगावकर यांनी व्यक्त केला आहे.