औरंगाबाद - केंद्र व राज्य सरकाराच्या विरोधात कामगार संघटनांनी देशव्यापी आंदोलन केले. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, लाल बावटा रिक्षा युनियन, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, लाल बावटा घरेलू मोलकरीण कामगार संघटनानी आंदोलनात सहभाग नोंदवत विविध प्रकारे आंदोलन केलं.
कोरोनाचे संकट असल्याने कुठल्याही प्रकारच्या आंदोलनास परवानगी नाही. त्यामुळे मजूर आणि मोलकरणीचे काम करणाऱ्या महिलांनी आपआपल्या घराबाहेर येऊन लॉकडाऊनचे नियम पाळत मूक निदर्शने केली. औरंगाबादेत रिक्शावाले, मोलकरणी, कारखान्यातील कामगार, कंत्राटी कामगार, फेरीवाले यांनी आपल्या मागण्या कागदावर लिहून कामाच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावून मूक निदर्शने केली.
लॉकडाऊनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यवसायिक, शेतकरी हे सर्व अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. लॉकडाऊन काळातील वेतन कामगारांना द्यावे, तसेच कोणतीही कामगार कपात करण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही बहुसंख्य उद्योगांनी कायम कामगार व कंत्राटी, हंगामी कामगारांना वेतन दिले नाही. रोजचे उत्पन्न बंद झालेल्या गोरगरीब, कष्टकरी व स्थलांतरित कामगारांना व गरजूंना सरकारी गोदामात प्रचंड अन्नधान्य साठा असूनही पुरेसे व वेळेवर अन्नधान्य दिले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पंतप्रधानांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे असून त्यात अडचणीत असलेल्या कामगारांना कुठलीही थेट मदत केलेली नाही असाही आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात, आयटकसह इतर कामगार संघटना सहभागी झाल्या. केंद्र व राज्य सरकारांनी कामगार विरोधी धोरणे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी आजच्या आंदोलनात दिला.
आंदोलकांनी केलेल्या प्रमुख मागण्या
1) कायदे बदलून कामगारांचा घात करु नका.
2) पेट्रोल डीझेलची दरवाढ रद्द करा.
3) कामाचे तास पूर्वीप्रमाणेच आठ तास करा.
4) आयकर लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये थेट रोख मदत द्यावी.
5) मागेल त्याला कोरोना काळात किराणा कीट द्या.
6) सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी व व्यवस्थेसाठी जीडीपीच्या ५ टक्के खर्च द्या.
7) सर्व कष्टकऱ्यांना दहा हजार रुपये कोरोना काळात दरमहा रोख रक्कम मदत द्या.
8) आरोग्य क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना प्राधान्याने शासकीय नोकरीत सामावून घ्या.
9) अत्यावश्यक सेवेत काम करणारे व ज्यांचा पगार कपात केला अशा कामगार कर्मचाऱ्यांचा लाॅकडाऊन काळातील ईएमआय माफ करा.
10) सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे वीज बील, मालमत्ता कर, पाणी पट्टी लाॅकडाऊन काळात माफ करा.
11) आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व कामगारांना 50 लाखाचा वीमा काढल्याचे पत्र द्या.
12) फेरीवाल्यांना लाॅकडाऊन काळात दरमहा रोख रक्कम दहा हजार रुपये द्या.
13) जे पालक मूल सांभाळण्यास घरी आहेत त्यांचा पगार थांबवू नये.
14) लोकांना माणसिक आधाराची गरज आहे त्यांना आर्थिक अरिष्टातून आधी बाहेर काढा.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी अॅड अभय टाकसाळ, किरणराज पंडित, भगवान निकाळजे, गजानन खंदारे, राजु हिवराळे, विकास गायकवाड, संदीप पेढे, बी. एम. चौधरी, शकील शेख, विजय रोजेकर, नईम ख़ान, श्रीकृष्ण ढोबळे, शेरखान मस्तान खान, शबाना बेगम, शालुबाई कांबळे, चंदाबाई आराक, कविता होर्शिल, उज्वला नरवडे, कविता गायकवाड, बाबुलाल वाघ, अमोल सरोदे, विनोद चव्हाण, बबन बुर्कुल, शेख बुडन, शेख पाशा, इम्रान खान, यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.