औरंगाबाद - शहरात उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. याच पूलाच्या कॉलमसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात एक कार पडल्याची धक्कादायक घटना एमआयटी कॉलेज समोर घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे कार मधील दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मात्र यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भगवान कोंडके असे त्या कार मालकाचे नाव आहे.
अशी घडली घटना-
भगवान कोंडके हे वाळूज येथील खासगी कंपनीत काम करत असून ते आपले काम संपवून महानुभाव आश्रम पासून शहानुरमियाँ दर्ग्याकडे कारने जात होते. दरम्यान एमआयटी कॉलेज जवळच्या रस्त्यावर उड्डाण पुलाच्या कामासाठी मधोमध 25 फूट खड्डा खोदलेला आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास अंधारामध्ये कोडंके यांना रस्त्यातील खड्डा दिसून आला नाही आणि त्यांची चारचाकी खड्ड्यात कोसळली. खड्ड्यात पाणी असल्याने गाडीतील कोंडके आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला इजा झाली नाही.
कार झाली लॉक.. क्षणात बुडाली-
कोंडके यांची कार पाण्यात पडल्यावर कारचे दरवाजे अचानक लॉक झाले. त्यामुळे कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर येता येत नव्हते. कार पडल्याचा आवाज येताच तिथे असणारे रफिक शेख आणि प्रकाश पेठवडकर यांनी खड्ड्यात उतरून कारची काच फोडली आणि दोघांना बाहेर काढले त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जवनांनी पाण्यात बुडालेली कार खड्ड्यातून बाहेर काढली.