औरंगाबाद - मनपा हद्दीत असलेल्या शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने मुंबई, ठाणे, पुण्यानंतर आता औरंगाबाद महानगर पालिकेने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले.
हेही वाचा - Aurangabad Kranti Chowk Flyover Crack : क्रांती चौक उड्डाणपुलाला तडा, पूल धोकादायक होण्याची शक्यता!
रुग्णसंख्येत वाढ
औरंगाबादमध्ये मंगळवारी रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. तब्बल सहा महिन्यानंतर शंभरहून अधिक नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, प्रशासनासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने काही निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये कडक निर्बंध लावण्यासोबतच महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अवघ्या 23 दिवसांत शाळा पुन्हा बंद
कोरोनाचे रुग्ण कमी झाले असल्याने एक डिसेंबर रोजी राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, औरंगाबाद महानगरपालिकेने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दहा दिवस अधिकचा वेळ घेत 10 डिसेंबर रोजी शाळा सुरू केल्या होत्या. त्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या दिवसापासून रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे, सुरू झालेल्या शाळा अवघ्या तेवीस दिवसांत बंद करण्याची वेळ आली आहे. आता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.