औरंगाबाद - मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती मुंबईच्या आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्याच्या समर्थनार्थ औरंगाबादेत मराठा क्रांतिमोर्चा समन्वयकांनी पाठिंबा देत आहे. आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाजीराजे छत्रपती आंदोलन करत असताना 'राजा उपाशी आणि समाज तुपाशी' अस होणार नाही, म्हणून त्यादिवशी दिवसभर मराठा समाज अन्न त्याग करणार आहे. त्याचबरोबर शहरातील क्रांतीचौक येथे महाजारांना समर्थन म्हणून उपोषणाला सुरुवात होईल. प्रत्येकाला मुंबईला आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात आणि गावात जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयसमोर आंदोलन करावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
- शहरात झाली समन्व्यकांची बैठक
संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हडको भागातील गुलाबपुष्प मंगल कार्यालयात मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणाबाबत आंदोलनाची पुढील वाटचाल ठरवण्यावर चर्चा झाली. त्यात संभाजी महाराजांना समर्थन देऊन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय झाल्याची माहिती समन्वयक अप्पासाहेब कुढेकर, रवींद्र काळे पाटील, सुकन्या भोसले, विक्कीराजे पाटील यांच्यासह इतर समन्वयकांनी दिली आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन.. राजू शेट्टींनी दिला 'हा' इशारा