औरंगाबाद - राज्यातील धार्मिक स्थळे उघडावी या मागणीसाठी मराठवाड्यातील विविध धार्मिक स्थळांसमोर आंदोलन करण्यात आले. औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिरासमोर भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करा, अशी मागणी गेल्या दिवसांपासून भाजपकडून करण्यात येत आहे. राज्यात जवळजवळ सर्व व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. मात्र, मंदिरांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. हिंदुत्ववादी असलेली शिवसेना दारूची दुकान उघडते मात्र मंदिर का उघडत नाही असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात आहे. मंदिरे बंद असल्याने मंदिरांवर आधारित असलेले अर्थचक्र थांबले आहे. हार - फुल विकणारे व्यावसायिक, पूजा सांगणारे पुरोहित, भजनी मंडळ, जागरण गोंधळ घालणारे गोंधळी, वाघ्या - मुरळी यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. वारंवार मागणी करुनही मंदिर उघडण्यास राज्य सरकार तयार नसल्याने भाजप अध्यात्म आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भजनी मंडळ, पुरोहित, गोंधळी यांनी सहभाग घेतला. गजानन महाराज मंदिर समोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी होम हवन करत सरकारचा निषेध केला. गोंधळीनी जागरण गोंधळ सादर करत कोरोना नष्ट व्हावा आणि पुन्हा मंदिर उघडावी अशी मनोकामना केली. दारू दुकान उघडणाऱ्या सरकारला मंदिराचं वावडं का? कोरोना फक्त मंदिरांमधून पसरतो का? असा प्रश्न अध्यात्म विकास आघाडीचे मराठवाडा संयोजक संजय जोशी यांनी उपस्थित केला. तर लवकरात लवकर मंदिर उघडून दिलासा द्यावा, अशी मागणी पुरोहितांकडून करण्यात आली.
भाजपच्या या आंदोलनात खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रमोद राठोड, दयाराम बसय्ये, महिला आघाडीच्या सविता कुलकर्णी, माधुरी आदवंत, अमृता पालोदकर यांच्यासह पुरोहित, मंदिरातील पुजारी, गोंधळी यांनी सहभाग घेत मंदिर उघडण्याची मागणी केली.