औरंगाबाद - इंग्रजी शाळेत शिक्षण घेणे म्हणजे आपले काम नाही, असे मध्यम आणि गरिबी रेषेखालील (BPL) पालकांना वाटते. चांगले शिक्षण हे जणू त्यांच्यासाठी स्वप्नच आहे. मात्र गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मनपाने पुढाकार घेत सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रम शाळा सुरु करण्याचा निर्णय ( AMC will start CBSE school ) घेतला. जून महिन्यात तीन शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी दिली. ( aurangabad municipal corporation )
![AMC CBSE School](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-aur-1-amc-cbsc-school-7206289_26052022164710_2605f_1653563830_469.jpg)
यावर्षी सुरु होणार तीन शाळा - महानगर पालिकेच्या शाळा म्हणले की भकास इमारती, काल बाह्य झालेली शिक्षण पद्धती डोळ्यासमोर येते. मात्र औरंगाबादच्या मनपा शाळांनी कात टाकायला सुरुवात केली आहे. यावर्षी सीबीएसई पॅटर्न च्या शाळा सुरु करणार आहे. सिडको येथील एन 12, इंदिरा नगर येथील प्रियदर्शनी शाळा, शहागंज येथील चेलीपुरा हायस्कुल येथे ज्युनियर केजी आणि सिनियर केजी हे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. मनपाच्या ज्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा, इमारतीची व्यवस्था आहे. या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शाळा सुरु करण्यात येत आहे. सध्या आहे त्या शिक्षकांवर अभ्यासक्रमाबाबत जबाबदारी टाकण्यात आली असून, पुढील वर्ग सुरु झाल्यावर शिक्षकांची भरती करण्याचा मानस असल्याचे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी सांगितले.
मागील वर्षी सुरु झाल्या दोन शाळा - कोविड काळातून बाहेर पडत असताना मागील वर्षी महानगरपालिकेने सीबीएसई च्या दोन शाळा सुरु केल्या. ज्यामध्ये उस्मानपुरा भागात ज्युनिअर केजी ते पहिली आणि गारखेडा येथे ज्युनिअर केजी ते दुसरी अशी शाळा सुरु केली. या दोन शाळांमध्ये अवघ्या काही तासांमध्ये ऍडमिशन फुल झाले. त्या नंतर पालकांनी आणखी शाळा सुरु करा अशी मागणी केली होती. त्यामुळे मनपाने पायाभूत सुविधांचा अभ्यास आणि मागणीचा विचार करून तीन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी सांगितले.
![AMC CBSE School](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-aur-1-amc-cbsc-school-7206289_26052022164710_2605f_1653563830_18.jpg)
गरीब विद्यार्थ्यांना मिळाले आधार - मागील वर्षी सुरु झालेल्या दोन शाळांमध्ये अवघ्या काही तासांमध्ये ऍडमिशन पूर्ण झाले असून दोन्ही शाळा मिळून 175 विद्यार्थी महानगर पालिकेच्या शाळेत सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती खराब असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी अधिकचा खर्च शक्य नाही. त्यात वाढती महागाईमुळे आर्थिक भार वाढला आहे. इंग्रजी शाळांचे वाढते शुल्क पाहता अनेक पालक मराठी शाळांकडे वळत आहेत. त्यात मनपाच्या शाळाने सुरु केलेल्या इंग्रजी शाळांमुळे दिलासा मिळाला असल्याचे पालक सुशांत मगरे यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईत तब्बल २६९ अनधिकृत शाळा गेल्या १० वर्षांपासून सुरू