औरंगाबाद - गरिबांसाठी तीन महिन्यांचे वीजबिल माफ करण्याची मागणी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली. राज्यात विविध ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विनंती करणारे निवेदन देण्यात आले. औरंगाबाद येथे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे यांनी निवेदन देत मागण्या मांडल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या गरिबांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना विजेचे बिल भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी ही मागणी सरकारकडे केल्याचं जयप्रकाश नारनवरे यांनी सांगितलं.
याआधी लॉकडाऊन असल्याने घरातच बसून विविध पद्धतींनी आंदोलन करण्यात आले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची ही मागणी नसून विनंती करत असल्याचे नारनवरे म्हणाले. त्यामुळे सोमवारी राज्यांतील विविध ठिकाणी मागण्यांचा दुसरा टप्पा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेस पक्ष सरकारचा भाग असला तरी आम्ही आमच्या पक्षातर्फे विनंती आणि मागणी केली असून या मागण्या सरकार मान्य करेल अशी आशा जयप्रकाश नारनवरे यांनी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्ह्यातील अनुसूचित विभागातर्फे जयप्रकाश नारनवरे, सिद्धार्थ भिसे, संतोष दिडवाले, आकाश खरात, राहुल भालेराव, विशाल थोरात यांनी आपले निवेदन दिले.