अमरावती - आज महाबीजवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील कंपन्यांकडून राज्यात बियाणे येत आहेत. या सर्व खासगी कंपन्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्र्यांना कमिशन मिळते, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
राणा दाम्पत्याची न्यायालयात हजेरी - गत वर्षी दिवाळीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्य विरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात आज जिल्हा सत्र न्यायालयात तारीख असल्यामुळे राणा दाम्पत्य जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले होते.
राणा म्हणतात, न्याय मिळेल हा विश्वास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासनकाळात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली होती. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी आंदोलन केले असता माझ्यासह आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना कारागृहात डांबण्यात आले होते. सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या सर्व पिकांवर लाल्या रोग आला होता. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. शेतात सडलेली पिके घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलो होतो. त्यावेळीसुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही केलेल्या एकूण सात ते आठ आंदोलना संदर्भात न्यायालयात तारीख होती. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही लढा देतच राहू. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यामुळे आम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आले. मात्र, आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल, असे देखील आमदार रवी राणा म्हणाले.
आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी - शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची सदैव भूमिका राहिली आहे. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले होते. याच प्रकरणाची आज न्यायालयात तारीख होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कुठल्याही शिक्षेला घाबरत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही सदैव प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.