अमरावती - तिवसा येथे एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेखर विठोबाजी यावले, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेखर विठोबाजी यावले यांच्याकडे ६ एकर शेती आहे. शेतीवर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४० ते ५० हजार रुपयांचे कर्ज आहे. शेतीची सर्व कामे ही शेखर यावले करत होते. त्यांनी सोयाबीन, तूर आणि कपाशीचे पीक घेतले होते. मात्र, शेतीच्या उत्पनामध्ये सतत नापिकी, योग्य भाव त्यांना मिळत नव्हता. त्यांच्याकडे शेतीची मशागत आणि पेरणीसाठीही पैसे उरले नव्हते. ते अजूनही अविवाहित होते. कित्येक वर्षापासून त्यांचे लग्नही जुळत नव्हते.
रात्री ११ च्या सुमारास गावातील तिवसा पोलीस ठाण्याजवळ असलेल्या विहिरीत यावले यांनी उडी घेतली. सकाळी एक महिला विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता पाण्यामध्ये त्यांना मृतदेह दिसला. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी तिवसा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आला आहे.