अमरावती : शहरापासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णानगर या गावचा पेढा सगळीकडे प्रसिद्ध आहे. कारण येथील शेतकरी आपल्या जनावरांच्या दुधावर प्रक्रिया करून हा पेढा बनवतात. त्यामुळे इथल्या पेढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी राहते. या प्रसिद्ध पेढ्याच्या माध्यमातून लोकांचे तोंड गोड करणारे पेढे उत्पादक मात्र सध्या मोठ्या संकटात सापडले आहे. कोरोनामुळे आधीच दुकाने सुरू ठेवायला वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच मेळघाटात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या घटल्याने पेढ्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पूर्णानगरच्या प्रसिद्ध पेढ्याचा व्यवसायालाही आता कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
पूर्णानगर या गावातील बहुतांश शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धवसाय करतात. यातील अनेकजण याच दुधावर प्रक्रिया करून चांगल्या दर्जाचा भेसळमुक्त पेढा तयार करतात. अमरावतीवरून परतवाडाला जात असताना किंवा मेळघाट-चिखलदराला जाणारे पर्यटक आवर्जून पूर्णानगरला थांबून पेढा खरेदी करतात. परंतु मागील वर्षीपासून कोरोनाने शिरकाव केल्यानंतर या व्यवसायाला मरगळ आली आहे. त्यात आता दुकाने सुरू ठेवायला काही निर्बंध घातल्याने चार वाजताच दुकाने बंद करावी लागत आहेत. त्यामुळे पेढे विक्रीत मोठी घट झाली आहे.
दुधाची मागणी घटल्याने म्हशीं विकल्या..
याच गावातील दूध उत्पादक शेतकरी उमेश महिंगे हे अनेक वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. सोबत दुधावर प्रक्रिया करून ते पेढे, लस्सी, पनीर, मलाई आणि दुग्धजन्य पदार्थची निर्मिती करत होते. परंतु आता दुधाची मागणी घटल्याने आणि पेढे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांनी घरी असलेल्या १६ पैकी १२ म्हशी विकून टाकल्या आहेत. या गावातील ५० टक्क्यांहून अधिक लोक दुग्धव्यवसाय करत असल्याचे उमेश महिंगे यांनी सांगितले.
म्हणुन आम्ही इथला पेढा खरेदी करतो..
अमरावती येथील ग्राहक ऋषिकेश गावंडे सांगतात, की आपल्या कामानिमित्त त्यांचे कायम अमरावती-परतवाडा येणेजाणे होते. तेव्हा येता-जाता दरवेळी ते पूर्णानगर येथे आवर्जून थांबून पेढा खरेदी करतात. इतर पेढ्यांच्या तुलनेत येथील पेढ्याची चव खूपच वेगळी आहे. विशेष म्हणजे हा पेढा डोळ्यासमोर बनवला जातो, त्यामुळे कुठलीच भेसळ यात नसल्याचं ऋषिकेश गावंडे सांगतात.
पूर्वी तीस किलो विकायचो आता फक्त दहा किलो पर्यत..
"माझा अनेक वर्षापासून हा पेढ्याचा व्यवसाय आहे. आमच्या पूर्णानगरचा पेढा हा प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी स्वतः दूध घोटून हा पेढा तयार करतात. पेढा शुद्ध असल्याने त्याला मोठी मागणी आहे. आम्ही पूर्वी दररोज पंचवीस ते तीस किलोपर्यंत पेढा विकत होतो. परंतु, आता लॉकडाऊनमुळे रोज केवळ पाच ते दहा किलोपर्यंत पेढा विकला जातो" अशी माहिती पेढा उत्पादक अभिजीत तिवारी यांनी दिली.
हेही वाचा : 'ईटीव्ही भारत' विशेष - दुकानांमधील अन्न सुरक्षा रामभरोसे, 30 हजार दुकानांसाठी अवघे 5 अधिकारी