नवी दिल्ली – कोरोना महामारीत टाळेबंदी घोषित केल्यानंतर एप्रिलमध्ये दूरसंचार कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये 8.2 दशलक्ष ग्राहक गमाविले आहेत. जिओचे 1.6 दशलक्ष ग्राहक वाढले आहेत. ही आकडेवारी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जाहीर केले आहे.
ट्रायच्या आकडेवारीनुसार एअरटेल आणि व्होडाफोनने सर्वाधिक ग्राहक गमाविले आहेत. एअरटेलचे एप्रिलमध्ये 5.2 दशलक्ष ग्राहक कमी झाले आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे 4.5 दशलक्ष ग्राहक कमी झाले आहेत. मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या जिओचे एप्रिलमध्ये 1.6 दशलक्ष ग्राहक वाढले आहेत. असे असले तरी जिओच्या वाढलेल्या ग्राहकांचीही आकडेवारी पूर्वीपेक्षा कमी आहे.
जिओचा दूरसंचार क्षेत्राच्या बाजारपेठेत 30 एप्रिलअखेर 33.85 टक्के हिस्सा आहे. एअरटेलचा 28.06 टक्के, व्होडाफोन आयडियाचा 27.37 टक्के, बीएसएनएलचा 10.43 टक्के तर एमटीएनएलचा 0.29 टक्के हिस्सा राहिला आहे.
टाळेबंदीत शहरी भागातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील दूरसंचार घनतेचे (टेलिडेन्सिटी) प्रमाण हे 138.41 टक्क्यांवरून 136.2 टक्के झाले आहे. तर ग्रामीण भागातील दूरसंचारघनतेचे प्रमाण हे 58.54 टक्क्यांवरून हे 58.61 टक्के झाले आहे.
टाळेबंदीत अनेक किरकोळ रिचार्जचे दुकाने बंद होती. त्यामुळे विविध प्लॅनला दूरसंचार कंपन्यांना मुदतवाढ द्यावी लागली आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार एअरटेल आणि व्होडाफोनकडून काही प्लॅनची मुदत 3 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या रिचार्ज प्लॅनची एकूण किंमत 500 कोटी रुपये असेल, असा दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.