नवी दिल्ली - भांडवली खर्चाचे नियोजन थांबविण्याचे दूरसंचार विभागाकडून कोणतेही आदेश मिळाले नसल्याचा बीएसएनएलने खुलासा केला. आर्थिक संकटामुळे बीएसएनएल सध्या आर्थिक संकटात आहे.
बीएसएनएलच्या वित्तीय विभागाला दूरसंचार विभागाच्या वित्तीय विभागाकडून आदेश देण्यात आल्याचे सूत्राने म्हटले होते. त्या आदेशात बीएसएनएलला भांडवली खर्चाचे कार्यक्रम थांबविण्याचे म्हटले होते. हे आदेश १२ जुनला बीएसएनएलच्या सर्व सर्कलला देण्यात आले होते.
भांडवली खर्चासाठी काढण्यात आलेल्या कोणत्याही नव्या कंत्राटासाठी नवी दिल्लीतील कॉर्पोरेटर अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी, असेही आदेशात म्हटले होते. मात्र असे कोणतेही आदेश आले नसल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे. दूरसंचार विभागाकडून तसे आदेश देण्यात आल्याची माहिती तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे.
बीएसएनएलचे दोन महिन्यांत पुनरुज्जीवन होणार-
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय केंद्र सरकारने पुढे ढकलला होता. केंद्रीय राज्य दूरसंचारमंत्री संजय धोत्रे यांनी दोन्ही कंपन्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्तावावर दोन ते तीन महिन्यात निर्णय होणार असल्याचे सांगितले.