नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगातील कंपन्यांनी विनंती केली आहे. देशातील पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगांची संघटना फेथच्या (एफएआयटीएच) सदस्यांनी पर्यटन मंत्रालयाला विविध रणनीतीचे उपाय सूचविले आहेत.
भारतीय पर्यटन उद्योग त्वरित सुरू होण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास फेथचे सल्लागार सीईओ आशिष गुप्ता यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या पातळीवर आंतरमंत्रीय टास्क फोर्स नेमून टास्कने रणनीती आखावी, असे फेथने सरकारला सूचविले आहे. हे टास्क फोर्स उद्योगाल चालना देण्यासाठी विविध पावले उचलू शकेल, असे संघटनेने म्हटले आहे.
फेथने हे सरकापुढे ठेवले प्रस्ताव-
- आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटर्ससाठी इंडियन टूरिझम मार्ट सुरू करावा, असा प्रस्ताव फेथने सरकारपुढे ठेवला आहे. त्यामधून देशातील पर्यटन उत्पादनांबाबत विश्वास निर्माण होईल, असे पर्यटन आणि आदरातिथ्य संघटनेने म्हटले आहे.
- पर्यटन आणि आदरातिथ्य कंपन्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी कर्जफेडीची मुदत द्यावी, अशीही संघटनेने मागणी केली आहे.
- दारू परवाना, टूर परवाना आदी परवान्यांचे स्वयंचलितपणे नुतनीकरण करावे, अशी संघनटेने सरकारकडे विनंती केली आहे.
- पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी दिल्लीमधील हॉटेल सुरू करावीत, असे संघटनेने म्हटले आहे.
फेथ ही देशातील पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य क्षेत्रातील दहा संघटनांची शिखर संस्था आहे. कोरोना महामारीमुळे देशातील पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगाला मोठा फटका बसला आहे.