चंद्रपूर - दाताळा मार्गाजवळ पैशाच्या वादातून युवकाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात ही घटना मध्यरात्री घडली. निलेश गोटे असे मृत युवकाचे नाव आहे. चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली.
निलेश बुधवारी रात्री त्याच्या घराजवळ असताना तीन चार युवक अचानक आले आणि त्यांनी निलेशवर चाकूने हल्ला चढवला. त्याच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर सपासप वार करण्यात आले. त्याच्या वडिलांसमोरच हे घडले. वडिलांनी त्यातील एका हल्लेखोराचा चेहरा बघितला आहे. तसेच, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निलेशने प्राण सोडण्यापूर्वी वडिलांना आपल्या मारेकऱ्याचे नाव सांगितले. अंकित देहारकर आणि त्याच्या मित्रांनी हा हल्ला केल्याचे त्याने सांगितले. हा प्रकार पैशाच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, हत्येमागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.
संचारबंदी असताना हे युवक रात्री आले कसे आणि त्यांनी हल्ला करून पळूनही गेले. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली असता, त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. या प्रकरणी तपास सुरू आहे. अद्याप आरोपी पकडण्यात आलेले नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.