मुंबई- धारावी कोरोना नियंत्रण पॅटर्नची डब्ल्यूएचओने दखल घेतली, मात्र त्याचेे सर्व यश महाराष्ट्र सरकार घेत आहे. धारावीमध्ये कोरोना संदर्भात मिळालेल्या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही वाटा आहे, ते शांतपणे गाजावाजा न करता काम करत होते. धारावीच्या यशात आरएसएसचा उल्लेख केला नाही, तर त्यांच्यावर अन्याय होईल, असे नितेश राणे डब्ल्यूएचओला ट्विटरवर मेन्शन करत म्हणाले.
धारावीत कोरोना संसर्ग कमी झाल्याने शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने धारावी कोरोना पॅटर्नची दखल घेत ट्विटरवर कौतुक केले होते. त्यावर धारावीच्या स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले आहे, ते धारावीकरांचे यश आहे. पुढे देखील कोरोनाच्या लढाईत असेच सहकार्य व मदत करा, असे गायकवाड म्हणाल्या होत्या.
धारावीत कोरोना नियंत्रणाची नोंद जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. त्यात आरएसएसच्या स्वयंसेवकांचा देखील मोठा वाटा आहे. सरकार जर हे सर्व यश घेत असेल. त्यात आरएसएसला सहभागी करत नसेल, तर हा त्यांच्यावर अन्याय होईल. जागतिक आरोग्य संघटनेने या बाबीची दखल घेतली पाहिजे, असे भाजप आमदार नितेश राणे म्हणालेत.