मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्य सरकारचा महसूल मार्चपासून बंद आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. यात एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईतील दहा नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारच्या फायद्याचा ठरत आहे. ही कार्यालये सुरू केल्यापासून नोंदणी व्यवहारात वाढ झाली असून मे महिन्यात 18 कोटी 12 लाखांचा महसूल सरकारला मिळाला आहे.
नोंदणी-मुद्रांक शुल्कातून सरकारला मोठा महसूल मिळत असताना हे व्यवहारही बंद असल्याने सरकारच्या आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. ऑनलाइन नोंदणीलाही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच 1 ते 15 मे पर्यंत केवळ 1 दस्तनोंदणी झाली होती आणि त्यातून फक्त 424 रुपये इतका महसूल मिळाला होता. दिवसाला कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या या कार्यालयाकडून 15 दिवसांत 500 रुपयेही महसूल न मिळावा, हे इतिहासात पहिल्यांदाच घडत होते. त्यामुळे अखेर महसूल वाढवण्यासाठी सरकारने 18 मे रोजी मुंबईतील 10 नोंदणी कार्यालये सुरू केली.
त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आहे. कारण 18 ते 31 मे पर्यंत 18 कोटी 12 लाखांचा महसूल सरकारला मिळाला आहे. ही सरकारसाठी दिलासादायक बाब असून आता यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 1 ते 31 मे पर्यंत 1 हजार 404 दस्तांची नोंदणी झाली आहे. यातून हा 18 कोटी 12 लाखांचा महसूल मिळाला आहे. यापैकी 16 कोटी 37 लाख रुपये कन्व्हेयन्समधून मिळाले आहेत. तर, लिव्ह अँड लायसन्समधून 14 लाख 71 हजार रुपये महसूल मिळाला आहे. उर्वरित महसूल इतर दस्तनोंदणीतून मिळाला आहे.