परभणी - जिल्ह्यात कालपासून (मंगळवार) कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळून आला नाही. त्यामुळे परभणीकरांना कोरोनापासून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते. मात्र, मंगळवारपासून नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या शून्य आहे. तर मागील महिन्यात 1 आणि सोमवारी (1 जून) अशा 24 रुग्णांना रूग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर आज (बुधवार) देखील 6 रुग्णांना सुट्टी मिळाली आहे. शिवाय आज 32 अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत 86 पैकी 28 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी परतले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला. सध्या परभणीत 56 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील मानवत शहरातील 3 आणि जिंतूर तालुक्यातील 1 अशा 4 संशयितांच्या स्वॅबचा अहवाल सोमवारी रात्री पॉझीटीव्ह आला होता. ज्यामुळे जिल्हा प्रशासन अस्वस्थ झाले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाकडे जाईल की काय, अशी भीती असताना बुधवारी मात्र, नांदेड येथील प्रयोगशाळेकडून एकूण 32 जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले आहे. तर बुधवारी सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील 39 वर्षीय पुरूष, ब्रम्हवाकडी येथील 25 वर्षीय पुरूष आणि चिकलठाणा येथील 25 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात बुधवारी संशयितांची संख्या 2 हजार 431 वर पोहचली आहे. तर यातील 193 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत असून, 2 हजार 205 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 86 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. याशिवाय 72 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आणि 33 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल नांदेडच्या प्रयोग शाळेने दिला आहे. या रुग्णांपैकी विलगिकरण कक्षात 497 जण दाखल असून संसर्गजन्य कक्षात 250 जण आहेत. तर यापूर्वी विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1 हजार 684 जण असून आतापर्यंत 86 पॉझीटीव्ह पैकी 28 जण बरे होवून घरी गेले आहेत. तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना रूग्णालयात 56 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
बुधवारी नव्याने 102 संशयीत रुग्ण दाखल झाले असून, त्यांच्यासह यापूर्वीचे मिळून एकूण 193 स्वॅबचा अहवाल नांदेडच्या प्रयोगशाळेकडे प्रलंबीत असून त्याचा निकाल काय येतो. याकडे प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.