नागपूर- कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत नागपूर कोरोनामुक्त करुया, असे आवाहन केले आहे.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागपुरात रुग्णसंख्या वाढली. सध्या बाजार हे गर्दीचे ठिकाण असून तेथील गर्दी कशी नियंत्रित करायची, यासंदर्भात चर्चा करण्याकरिता नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात विविध व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, यांच्यासह नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, 31 मे पर्यंत नागपुरात कोविड रुग्णांची संख्या 400 च्या जवळपास होती. मात्र, केवळ दीड महिन्यात 2 हजार 400 ने आकडा वाढला. सद्या बाधितांची संख्या 2 हजार 800 च्या घरात आहे. मृत्यू संख्याही 13 वरून 47 वर पोहोचली. यामागील सर्वात मोठे कारण नियमांचे पालन करण्याचे बंधन असतानाही ते पाळले जात नाही हे आहे. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणजे बाजार आहे. बाजारातही नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे. सम-विषम तारखेचा नियम असतानाही त्याचे उल्लंघन केले जात आहे, दुकानात क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक येणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या सर्व बाबींमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.