चेन्नई (तामिळनाडू) - माजी मुख्यमंत्री जयललिता यांची जवळच्या शशिकला एआयडीएमकेची सदस्य नसून टीटीव्ही दिनाकरन यांच्या अम्मा मुन्नेत्र कळगम या पक्षाच्या सदस्य आहेत, असा दावा एआयडीएमके पक्षाचे नेते सी. पोन्नईयान यांनी केला आहे. तसेच शशिकला यांना पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
ऑडिओ क्लिप व्हायरल?
शशिकला या पक्षाच्या सदस्या नाहीत. त्या दिनाकरन यांच्या समूहात आहेत. त्यांना पक्षाला पुनरुज्जीवित करायचे आहे, असे त्या म्हणू शकत नाहीत. तसेच जे कोणी शशिकला यांच्या संपर्कात आहेत, ते एआयडीएमके पक्षाशी संबंधित नाहीत, असेही पोन्नईयान यांनी स्पष्ट केले. एआयडीएमके पक्षाच्या नेत्या शशिकला आणि पक्षाच्या नेत्यामध्ये झालेल्या संवादासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या संवादात शशिकला यांना राजकारणात परत यायचे आहे, असे त्या बोलत आहेत. या फोन कॉलची पडताळणी एएमएमके पक्षाचे जनरल सेक्रेटरी दिनाकरन यांचे स्वीय सहायक जनार्थनन यांनी केली.
कोरोना संपल्यावर शशिकला या राजकारणात परत येणार आहेत, अशा संकेत त्यांनी 30 मेला दिली होती. शशिकला आणि पक्षाच्या नेत्यामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. याचवर्षी एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डीएमके पक्षाने एआयडीएमके पक्षाला हरवत सत्ता स्थापन केली.
राजकारणातून घेतलाय संन्यास -
'काळजी करण्याचे कारण नाही. मी पक्षातील मुद्दे सोडवेन. तुम्ही सर्व खंबीर रहा. एकदा कोरोना संपला की, राजकारणात परत येईन', असे शशिकला या संवादात म्हणाल्या. यानंतर आम्ही तुमच्या मागे आहोत, असा प्रतिसाद समोरच्या व्यक्तिने शशिकला यांना दिला. दरम्यान, याआधी मार्चमध्ये शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते.
त्या म्हणाल्या होत्या, 'मी राजकारणातून बाहेर पडत आहे आणि माझी देव जयललिता यांनी लावून दिलेल्या सोनेरी नियमांसाठी प्रार्थना करत आहे. मी जयललिता यांच्या ध्येयसाठी सतत प्रार्थना करत राहणार'. मिळकतीपेक्षा अधिक मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यानंतर फेब्रुवारीमध्ये त्या चेन्नईतील टी नगर परिसरात राहत आहेत.
माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांचे डिसेंबर 2016मध्ये निधन झाले. यानंतर शशिकला यांची एआयडीएमके पक्षाच्या महासचिवपदी निवड करण्यात आली होती. 2017मध्ये मिळकतीपेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आले. यानंतर त्यांनी पक्षाची सूत्रे त्यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडे सोपविली होती. ई. पलनीस्वामी यांना शशिकला यांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनविण्यात आले होते. मात्र, ओ. पन्नेरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गट पनीलास्वामी गटात विलीन झाला. यानंतर शशिकला आणि दिनाकरन यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.