(Aruna Asaf Ali) अरुणा असफ अली (Saluting Bravehearts) यांचा जन्म 16 जुलै 1909 रोजी कालका, पंजाब, ब्रिटिश भारत (आता हरियाणा, भारत) येथे बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील उपेंद्रनाथ गांगुली हे पूर्व बंगालमधील (आता बांगलादेश) बरिसाल जिल्ह्यातील होते. पण ते संयुक्त प्रांतात स्थायिक झाले होते. ते एका रेस्टॉरेंटचे मालक होते. त्यांचा आई अंबालिका देवी त्रैलोक्यनाथ सन्याल (एक प्रसिद्ध ब्राह्मो नेता) यांची कन्या होती. अरुणा यांची बहीण पूर्णिमा बॅनर्जी भारताच्या संविधान सभेच्या सदस्या होत्या. अरुणा यांचे शिक्षण लाहोरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट आणि नंतर नैनितालच्या ऑल सेंट्स कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतर अरुणा असफ अली यांनी कलकत्ता येथील गोखले मेमोरियल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम केले. दरम्यान त्यांची अलाहाबादमधील काँग्रेस पक्षातील एक नेते असफ अली यांच्याशी भेट झाली. धर्म आणि वयाच्या कारणास्तव पालकांच्या विरोधाला न जुमानता 1928 मध्ये अरुणा यांनी असफ अली यांच्याशी लग्न केले. भूमिगत चळवळीतील अग्रगण्य महीला स्वातंत्र्य सेनानी म्हणुन (underground freedom fighter) अरुणा असफ अली यांचे नाव घेतले जाते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी प्रारंभिक संबंध : अरुणा असफ अली यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोठा वाटा होता. असफ अलीशी लग्न केल्यानंतर, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य झाल्या. त्यानंतर त्यांनी मीठ सत्याग्रहादरम्यान सार्वजनिक प्रक्रियेत भाग घेतला. त्यानंतर त्यांच्यावर काही चुकीचे आरोप लावुन, त्यांना अटक करण्यात आली होती. 1931 मध्ये गांधी-आयर्विन करारानुसार ईतर सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली होती. मात्र अरुणा यांना सोडण्यात आले नाही. अरुणा यांनी सुध्दा ब्रिटीशांसमोर, महिला सहकैद्यांची सुटका केल्याशिवाय, स्वत: तेथुन जाण्यास नकार दिला. त्यानंतर महात्मा गांधींनी मध्यस्थी केल्यानंतरच त्यांच्यासह इतर महीला कैद्यांची सुटका करण्यात आली.
अंबाला येथील एकांतवास : 1932 मध्ये,अरुणा यांना परत अटक करण्यात आली, तेव्हा त्यांना, तिहार तुरुंगात कैदी म्हणुन ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपोषण सुरू करून, राजकीय कैद्यांच्या उदासीन वागणुकीचा निषेध केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे तिहार तुरुंगातील परिस्थिती सुधारली. मात्र या गोष्टीचा बदला म्हणुन त्यांना अंबाला येथे हलवण्यात आले आणि एकांतवासात ठेवण्यात आले. अंबाला येथुन झालेल्या सुटकेनंतर त्या राजकीयदृष्ट्या फारश्या सक्रिय नव्हत्या. परंतु 1942 च्या शेवटी, त्यांनी भूमिगत चळवळीत भाग घेतला. त्यात अरुणा फार सक्रिय होत्या.
भारत छोडो आंदोलनात प्रसिद्धी : 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने, मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो ठराव' मंजूर केला. ब्रिटीश सरकारने प्रमुख नेत्यांना आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना अटक करून,या अधिवेशनाला प्रत्युत्तर दिले आणि अशा प्रकारे आंदोलन अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला. अरुणा असफ अली यांनी, ९ ऑगस्ट रोजी उर्वरित अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले आणि गोवालिया टँक मैदानावर काँग्रेसचा झेंडा फडकवला. यातून आंदोलनाची सुरुवात झाली. अधिवेशनात पोलिसांनी गोळीबार केला. या प्रसंगी, धोक्याचा सामना पत्करणाऱ्या,अरुणाला त्यांच्या शौर्याबद्दल 1942 च्या चळवळीची नायिका म्हणून संबोधले गेले. आणि नंतरच्या काळात तिला स्वातंत्र्य चळवळीची 'ग्रँड ओल्ड लेडी' म्हटले गेले. अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी, अरुणा यांच्या नावावर अटक वॉरंट जारी करण्यात आले. पण अटक टाळण्यासाठी त्या भूमिगत झाल्या आणि 1942 मध्ये भूमिगत चळवळ सुरू केली. दरम्यान त्यांची मालमत्ता जप्त करून विकल्या गेली. दरम्यान, त्यांनी राम मनोहर लोहिया यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे मासिक इन्कलाबचे संपादनही केले. 1944 च्या अंकात,त्यांनी तरुणांना हिंसा आणि अहिंसेबद्दलच्या निरर्थक चर्चा विसरून क्रांतीमध्ये सामील होण्यास सांगून कृती करण्यास सांगितले. जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफ अली यांसारख्या नेत्यांचे वर्णन "गांधींची राजकीय मुले, पण कार्ल मार्क्सचे अलीकडचे विद्यार्थी" असे करण्यात आले. त्यांना पकडण्यासाठी सरकारने 5,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान त्या आजारी पडल्या. त्यांनी काही काळ दिल्लीतील करोलबाग येथील डॉ. जोशींच्या रुग्णालयात लपून काढला. लपून बाहेर येण्यासाठी आणि आत्मसमर्पण करण्यासाठी महात्मा गांधींजींनी त्यांना चिठ्ठी पाठवली. मात्र त्याला त्यांनी नकार दिला. 1946 मध्ये तिच्याविरुद्धचे वॉरंट मागे घेण्यात आल्यानंतरच, त्या जगापुढे आल्या.
स्वातंत्र्योत्तर, महापौरपद आणि प्रकाशनातील कारकीर्द : त्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या सदस्य होत्या. समाजवादी झुकाव असलेल्या कार्यकर्त्यांसाठी काँग्रेस पक्षाला एक ओढ होती. काँग्रेस पक्षाच्या समाजवादाच्या प्रगतीमुळे निराश होऊन १९४८ मध्ये तिने सोशालिस्ट पार्टी या नव्या पक्षात प्रवेश केला. त्यांनी रजनी पाल्मे दत्त यांच्या समवेत मॉस्कोला भेट दिली. या दोघांनी 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.
1954 मध्ये, त्यांनी भारतीय महिला राष्ट्रीय महासंघ, CPI ची महिला शाखा स्थापन करण्यास मदत केली. परंतु 1956 मध्ये निकिता ख्रुश्चेव्ह यांनी स्टॅलिनच्या मताचा इन्कार केल्यानंतर, त्यांनी पक्ष सोडला. 1958 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर म्हणून निवडून आल्या. कृष्ण मेनन, विमला कपूर, गुरु राधा किशन, प्रेमसागर गुप्ता, रजनी पाल्मे जोती, सरला शर्मा आणि सुभद्रा जोशी यांसारख्या सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या काळातील धर्मनिरपेक्षतावाद्यांशी त्या दिल्लीतील सामाजिक कल्याण आणि विकासासाठी जवळून कार्य करीत होत्या.
त्यांनी आणि देशभक्त नारायणन यांनी लिंक पब्लिशिंग हाऊस सुरू केले आणि त्याच वर्षी त्यांनी देशभक्त हे दैनिक आणि साप्ताहिक लिंक प्रकाशित केले. जवाहरलाल नेहरू, कृष्ण मेनन आणि बिजू पटनायक यांसारख्या नेत्यांच्या आश्रयाने ही प्रकाशने प्रतिष्ठित झाली. नंतर त्या अंतर्गत राजकारणामुळे प्रकाशनगृहातून बाहेर पडल्या. 29 जुलै 1996 रोजी नवी दिल्ली येथे 87 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.