नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आई हीराबेन मोदी यांचा उल्लेखही केला. देशात कोरोनाचा कहर असून अद्याप विषाणूचा धोका कमी झालेला नाही. कोरोना लसीसंदर्भात पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्या 100 वर्षीय आईने कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तुम्हीही लस घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांना केले.
‘मन की बात’ कार्यक्रमाअंतर्गत मोदींनी मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील दुलारिया खेडय़ातील रहिवाशांशी त्यांनी संपर्क साधला. त्यांना मार्गदर्शन केले आणि लस घेण्यास सांगितले. लसीबाबत कुठल्याही शंका बाळगण्याचे कारण नाही. लस अगदी सुरक्षीत आहे, असे मोदींनी त्यांना सांगितले. वैज्ञानिक व विज्ञान यावर विश्वास ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांना मोदींनी केले.
देशात 21 जून रोजी सर्वाधिक लसीकरण झाले आहे. आता प्रौढांनाही मोफत लस दिली जात आहे. लस न घेण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे. कोरोनाचा धोका आता टळला आहे, अशी धारणा झालेल्यांनी भ्रमातून बाहेर यावे. कारण, अद्याप कोरोनाचा धोका आहे. कोरोना रुप बदलत असून त्यात उत्परिवर्तने होत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन आणि लस टोचवून घेऊन तुम्ही कोरोनाचा धोका टाळू शकता, असे मोदी म्हणाले.
देशातील लसीकरण क्षमतेत वाढ -
संपूर्ण देशभरात लसीकरण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 64,25,893 जणांचे लसीकरण झाले आहे. तर भारतात आतापर्यंत एकूण 32,17,60,077 जणांना लस टोचवण्यात आली आहे. तसेच सक्रिय रुग्णांचा दर 1.94 टक्क्यांवर पोहचला आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांचा 96.75 आणि मृत्यू दर 1.31 टक्के आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आतापर्यंत 50 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या तीन राज्यात अनेक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही डेल्टा प्लस आढळला आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी आज ‘मन की बात’ द्वारे जनतेशी संवाद साधणार