लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अमौसी विमानतळाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रह्लाद मोदी धरणे आंदोलनाला बसले आहेत. लखनऊ पोलिसांच्या कारभाराविरोधात प्रल्हाद मोदी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतल्यामुळे संतापलेल्या प्रल्हाद मोदी यांनी धरणे सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. समर्थकांना न सोडल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रयागराज, जौनपूर आणि सुलतानपूर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी सहभागी होणार होते. अमौसी विमानतळावर उतरल्यानंतर ते रस्तामार्गे कार्यक्रमात जाणार होते. हे कळताच त्यांच्या शेकडो समर्थकांनी विमानतळाबाहेर गर्दी केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना विमानतळाबाहेर रोखलं. यावेळी काही पोलीस आणि समर्थकांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. हे माहिती होताच समर्थकांच्या सुटकेची मागणी करत ते विमानतळावरच धरण्याला बसले आहेत.
लखनौ पोलिसांनी माझ्या स्वागतासाठी आलेल्या 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पीएमोच्या आदेशानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले असेल. तर त्याची प्रत दाखवा, असे प्रल्हाद मोदी म्हणाले. माझा 4 फेब्रुवरीला सुलतानपूर, 5 फेब्रुवरीला जौनपूर आणि 6 फेब्रुवरीला प्रतापगढ दौरा आहे. त्यामुळे मी इथं आलो. येथे आल्यानंतर मला कळले की आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले आहे. म्हणूनच आज मी धरण्यावर बसलो आहे. आमचे सर्व कार्यकर्ते सुटेपर्यंत मी विमानतळाबाहेर धरण्यावर बसणार आहे, असेही ते म्हणाले.