नवी दिल्ली : ५-जी टेक्नॉलॉजीमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचा दावा करणारे संदेश गेल्या काही दिवसांपासून समोर येत होते. केंद्रीय संवाद मंत्रालयाने मात्र ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेंजिंग अॅप्स, तसेच सोशल मीडियावरुन असा दावा केला जात होता, की ५जी च्या चाचणीसाठी उभारण्यात आलेल्या टॉवर्समुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दूरसंचार विभागाला याबाबत माहिती मिळताच, त्यांनी स्पष्ट केले की या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. संवाद मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
अशा प्रकारची चुकीची माहिती देणारे संदेशांवर विश्वास ठेऊ नका, तसेच असे संदेश पुढे पाठवू नका असे आवाहन मंत्रालयाने केले आहे. या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे अशा अफवांना खतपाणी घालणे टाळा असे मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, देशात अद्याप ५-जी तंत्रज्ञानाच्या चाचणीला सुरुवातच झाली नसल्याचेही मंत्रालयाने यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा : मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी; कोविडच्या नियमांचे उल्लंघन