मुंबई - देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिल्लीपाठोपाठ मुंबई शहराचा क्रमांक लागत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने, म्हणजेच ‘एनसीआरबी’नं प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, विनयभंग, महिलांवर हल्ले, त्यांचा लैंगिक छळ करणे या प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
‘एनसीआरबी’नं मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या 19 महानगरांमध्ये सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे. राजधानी दिल्लीत महिला अत्याचाराचे 12 हजार 92 गुन्हे नोंदले गेले. तर मुंबईत 6 हजार 519 गुन्ह्यांची नोंद झाली. नागपूरमध्ये अशा गुन्ह्यांची 1 हजार 144 प्रकरणे नोंदली गेली आहेत.
नागपूरमधील गुन्हेगारीचा दर मुंबईपेक्षाही अधिक असल्याचं दिसून आलं आहे. एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा होण्याचं प्रमाण 13 पूर्णांक 7 शतांश टक्के इतकं असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
हेही वाचा - बळजबरीने पैशांची वसुली केल्याप्रकरणी ८ तृतीयपंथीयांना अटक