लखनौ - कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना उत्तर प्रदेशमध्येही इतर राज्यांप्रमाणे ऑक्सिजनच्या तुटवड्याचे संकट उद्भवले आहे. मीरत येथील न्यूटिमा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने आठ जण दगावल्याचा दावा करण्यात येत आहे.
मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी न्यूटिमा रुग्णालयात राडा केला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी दावा केला. मीरतचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अखिलेश मोहन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजन अभावी दगाविल्याचा दावा फेटाळला आहे. रुग्ण हे गंभीर रोगांमुळे मृत्युमुखी पडल्याचे डॉ. मोहन यांनी सांगितले. तसेच मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले दावेही त्यांनी फेटाळले आहेत.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अखिलेश मोहन म्हणाले, की मी तेथील डॉक्टरांशी बोललो आहे. नातेवाईकांनी ऑक्सिजनचा पुरवठा काही काळ खंडित झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याबाबत तपास केला जात आहे. ऑक्सिजनचा पुरवठा काठोकाठ आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा-पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची घेणार शपथ
दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे 2 लाख 95 हजार 752 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा-नीट-पीजी चार महिन्यांनी पुढे ढकलली! इंटर्न डॉक्टरही कोरोनाबाधितांवर करणार उपचार
कर्नाटकमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू
कर्नाटकच्या चमराजनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 24 कोरोना रुग्णांचा याठिकाणी बळी गेला आहे. यासाठी ऑक्सिजनच्या कमतरतेसह इतर गोष्टीही कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. या 24 रुग्णांपैकी 12 रुग्णांचा ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.