हैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telagana CM K Chandrashekhar Rao) यांनी कर्नाटकमध्ये धार्मिक संघर्ष निर्माण करण्यावरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर टीका केली. जाती-धर्मात संघर्ष निर्माण करणे चांगले नसल्याचे त्यांनी म्हटलं. 'केंद्रात सदाचाराचे काम करणारे सरकार असावे. राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत. रक्ताचा शेवटचा थेंब जरी सांडला तरी देशाला योग्य मार्गावर आणू', असे त्यांनी स्पष्ट केले. सिद्धीपेट जिल्ह्यातील मल्लन्ना सागर प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते जाहीर सभेला संबोधित करत होते.
देशात घृणास्पद गोष्टी घडत आहेत. आधीच्या सरकारांच्या प्रयत्नांमुळे बंगळुरू हे भारतातील सिलिकॉन सिटी बनले होते. मात्र, सांप्रदायिक कलहामुळे शैक्षणिक संस्था बंद पडल्या. कर्नाटकात सांप्रदायिक कलह निर्माण होत आहे, असे केसीआर म्हणाले.
सीएम केसीआर यांनी सिद्धीपेट जिल्ह्यातील थुक्कापूर येथे मल्लन्ना सागर जलाशयाचे उद्घाटन केले. मल्लन्ना सागर जलाशय हे कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत बांधण्यात आले आहे. या जलाशयाला अभियांत्रिकीचे आश्चर्य म्हटले गेले. सीएम केसीआर यांनी हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. या प्रकल्पामुळे तेलंगणाला कधीच दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. नव्या तेलंगणातील हा सर्वात मोठा जलाशय असून हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी या प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगार आणि अभियंत्यांचे विशेष आभार मानले.