बिलासपूर : बिलासपूरमधील संजू त्रिपाठी ( Sanju Tripathi ) हत्येप्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. मृत हा काँग्रेसचा नेता नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेंद्र जैस्वाल यांनी सांगितले की, तुर्कदीह बायपासवर ही घटना घडली. बुधवारी सायंकाळी 4.15 च्या सुमारास आरोपींनी संजू त्रिपाठीवर अंदाधुंद गोळीबार केला. तो चारचाकी मध्ये जात होता. गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बिलासपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय केशरवाणी म्हणाले, संजू त्रिपाठी एकेकाळी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र सध्या तो पक्षात कोणत्याही पदावर नाही.
8 राऊंड झाडले : बुधवारी संजू त्याच्या कारने साक्री भागातून शहरात परतत होता. दरम्यान, बायपासजवळअज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी तो स्वतः कार चालवत होता. हल्लेखोरांनी सात ते आठ राऊंड गोळीबार केला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका जिवंत काडतुसासह 7 खोके जप्त केले आहेत. मृताच्या गाडीच्या नंबर प्लेटवर सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी असे लिहिलेले आढळून आले. मात्र पारुल माथूर यांनी मृत व्यक्तीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे सांगितले.
दिवसाढवळ्या गोळीबार : पोलिसांनी म्हटले आहे की, परस्पर वादातून गोळीबाराचे प्रकरण समोर आले. संजू त्रिपाठीच्या संपत्तीवरून कौटुंबिक वाद सुरू होता यातुन ही घटना घडली असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करून जिल्ह्यात नाकाबंदीचे निर्देश देऊन तपास सुरू केला आहे. आरोपी मुखवटा घातलेले होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि संजू त्रिपाठीचा इतिहास तपासत आहेत.