जयपूर - राजधानी जयपूरमध्ये करोडोंच्या चोरीच्या प्रकरणात (Case of theft of Crores in Jaipur) पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील नटवरलाल जयेश रावजीभाई सेजपाल ( Natwarlal Jayesh Raojibhai Sejpal ), असे चोराचे नाव आहे. राजस्थानपूर्वी जयेशने मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये 13 ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. जयेश हा दरवेळी हॉटेल कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून चोरी करतो.
नटवरलाल जयेशने राजस्थानातील उदयपूर आणि जयपूर या दोन मोठ्या शहरांतील दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये अवघ्या पाच दिवसांत चोरी केली. जयेशने 20 नोव्हेंबर रोजी उदयपूर आणि 25 नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये चोरी केली. जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चोरीच्या घटनेपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.यात जयेश रिसेप्शनभोवती फिरताना दिसत आहे.
2018 मध्ये हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती...
नटवरलाल जयेशला हैदराबाद पोलिसांनी 2018 मध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये चोरी केल्याप्रकरणी अटक केली होती आणि त्यानंतर न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले होते. नुकताच जयेश जामिनावर तुरुंगातून बाहेर आला असून यावेळी त्याने राजस्थानला आपले नवे लक्ष्य बनवले आहे. या चोरट्याची माहिती सर्व जिल्हा पोलिसांना पाठवून पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच जयेशला पकडण्यासाठी जयपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांचीही मदत घेतली असून, त्याचवेळी जयपूर पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी मुंबई पोलिसांच्या उच्चपदस्थांच्या संपर्कात आहेत. जयपूर पोलिसांचे एक विशेष पथक बदमाशांच्या संभाव्य अड्ड्यांवर छापे टाकण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.