नवी दिल्ली - सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना 'ऑपरेशन ब्लू स्टार' राबवून संपवण्यात आले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरामध्ये शीख विरोधी दंगली भडकल्या. हा शीख विरोधी हिंसाचार काँग्रेसने घडवून आणल्याचा आरोप शिरोमणी अकाली दल पक्षाचे नेते आणि खासदार सुखबिर सिंह बादल यांनी केला आहे. या हिंसाचाराचे बळी ठरलेल्या शीख बांधवांना अजूनही न्याय मिळाला नसल्याचे म्हणत आता तरी त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली आहे.

अकाल तख्तावर लष्कराने केलेल्या हल्यानंतर शीख बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळेच ३०९ शीख सैनिक आपली छावणी सोडून निघून गेले होते. पवित्र स्थळावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. या धक्क्यातूनच त्यांनी लष्करी छावणी सोडण्याचे कृत्य केले होते. मात्र, लष्कराने 'कोर्ट मार्शल' करत त्यांना सेवेतून काढून टाकले होते. त्यामुळे गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्ताने त्यांना माफ करावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
इंदीरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरामध्ये काँग्रेसने शीख विरोधी दंगली घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी १० हजारांपेक्षा जास्त शीख बांधवाची हत्या करण्यात आली होती. काँग्रेसने सुवर्ण मंदीरावर हल्ला करुन शीखांच्या पवित्र स्थळ चिरडून टाकल्याचेही त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ३५ वर्षानंतर त्यांना न्याय मिळावा अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.