नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधींनी भरलेल्या उमेदवारी अर्जाचा वाद शेवटी संपला. त्यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्वाळा निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी उशिरा रात्री दिला आहे. उमेदवारी अर्जामध्ये सोनिया गांधी यांनी आपले खरे नाव नमूद केले नाही, असा आरोप काँग्रेस सोडून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनेश प्रताप सिंह यांनी लावला होता.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या पारंपारिक विधानसभा मतदार संघातून म्हणजेच रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी ११ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला होता. त्या अर्जामध्ये एंटोनिया माइनो हे त्यांचे खरे नाव सोनिया गांधींनी उमेदवारी अर्जामध्ये नमूद केले नाही, असा ठपका दिनेश प्रताप यांनी ठेवला होता. त्यासाठी गांधी यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणी त्यांनी उचलून धरली होती. तर, दिनेश प्रताप यांनी पक्षाचा राजीनामा न देता भाजपमधून उमेदवारी घेतली. त्यामुळे त्यांचा अर्जही रद्द व्हावा यासाठी काँग्रेस धडपड करत होती.
दोन्ही पक्षांच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले होते. तर, हे प्रकरण आयोगाच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी झाले होते. शनिवारी सकाळपासूनच अधिकारी या दोघांचेही प्रकरण निकाली लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याचा सपाटाही सुरू असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. दुपारी ३ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत दोघांच्याही अर्जाची तपासणी करण्यात आली. शेवटी दोघांचेही आरोप आधारहीन आहे, असे म्हणत अधिकाऱ्यांनी अर्ज वैध असल्याचा निर्वाळा देण्यात आला.
राहुल गांधींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह -
सध्या राहुल गांधी यांच्याही उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ते भारताचे नागरिक नसून ब्रिटनचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना ही निवडणूक लढवता येत नाही. त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी विनंती स्वतंत्र उमेदवार धृव लाल यांनी आयोगाला केली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकरणावर अयोग काय निर्णय देतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.