बेळगाव (कर्नाटक) - जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र, तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला विरोध केला होता. यानंतर कर्नाटक प्रशासनानेसुद्धा त्यांचीच बाजू घेत शुक्रवारी रात्री रातोरात हा अश्वारूढ पुतळा हटवला. याघटनेनंतर दोन्ही कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण तयार झाले होते. यानंतर आता आज (रविवारी) मनगुट्टी गावात शिवसेनेने या घटनेचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले.
मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या ठरावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही, तर मनगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिला होता. यानंतर आज (रविवारी) मनगुट्टी गावात शिवसेनेने या घटनेचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते. तर काही अनुचित काही प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
तर बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवा, या मागणीचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर असून कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील याचा गांभीर्यानं विचार करतील, असा आशावाद देखील शिंदे यांनी व्यक्त केला.