श्रीनगर - सरकारकडून पुरवण्यात येत असणाऱ्या सुरक्षेची आपल्याला काहीच गरज नाही, असे उर्मट वक्तव्य फुटीरतावादी नेते अब्दुल घनी भट यांनी केले आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने येथील सर्व फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा काढलेल्या नेत्यांमध्ये मिरवाज उमर फारूख, शबीर शाह, हाशिम कुरेशी, बिलाल लोन आणि अब्दुल घनी भट यांचा समावेश आहे. पुलवामा येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारकडून पुरवण्यात येत असलेल्या सुरक्षेची मला गरज नाही. काश्मिरी जनता हीच माझी सुरक्षा आहे. मी मृत्यूला घाबरत नसून हे कोणासोबतही घडू शकते. हुर्रियत नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा जाऊ द्या आणि भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाच्या शक्यता निर्माण होत आहेत, त्याकडे लक्ष द्या, असे घनी भट यांनी म्हटले आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर २ दिवस होऊन गेले असले तरिही जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली जमावबंदी तशीच ठेवण्यात आलेली आहे. असे असले तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली आहे. या आत्मघातकी हल्ल्यात सुरक्षा दलाच्या ४९ जवानांना वीरमरण आले आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)