नवी दिल्ली - कोरोनामुळे जीव गमावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाची हेळसांड होत असून यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना फटकारले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेत केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि दिल्ली सरकारना नोटीस पाठवली आहे. दिल्लीतील एलएनजीपी रुग्णालयालाही नोटीस पाठविण्यात आली आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. कोरोना संकट काळात दिल्लीतील रुग्णांची काळजी भयंकर आणि भीतीदायक पद्धतीने घेतली जात आहे, असे म्हणत दिल्ली सरकारला फटकारले. कोरोनाग्रस्तांची अत्यंत भयंकर पद्धतीने काळजी घेतली जात आहे, मृतदेह कचऱ्यातही सापडायला लागले आहेत, असे न्यायालयाने नमूद केले.
रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांची अत्यंत वाईट अवस्था पहा. वॉर्डामध्ये कोठेही शव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असलेल्यांचीही आम्हाला चिंता वाटते, असे न्यायाधीश म्हणाले. दिल्लीत रुग्णालयात कोठेही मृतदेह ठेवले असल्याचे माध्यमांतूनही समोर आले आहे, त्याचा हवाला न्यायालयाने दिला.
इतर राज्यांत कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येत असताना दिल्लीत 7 हजारांवरून चाचण्या 5 हजारांवर आल्या आहेत. दिल्लीत 2 हजार खाटा उपलब्ध आहेत. मात्र, रुग्णांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. कोरोनाग्रस्तांवर प्राण्यांपेक्षाही भयंकर पद्धतीने उपचार केले जात आहेत. एका घटनेत तर मृतदेह कचऱ्यात आढळून आला, असे उदाहरण न्यायालयाने दिले.