कोलकाता - साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीचे समर्थन करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले, असा आरोप कोलकाता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
'स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले. याद्वारे जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते त्यांना का सोडण्यात आले,' असा सवालही त्यांनी यावेळी केला.
भाजपतर्फे करण्यात आलेल्या ट्विटमध्येही साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले, असेही यात म्हटले आहे.
'तृणमूल काँग्रेसने बंगाली संस्कृतीच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. बंगालमध्ये सरस्वती पूजा आणि दुर्गा पूजा जर कोणी पुन्हा आदरपूर्वक सुरू करू शकत असेल तर, तो फक्त भारतीय जनता पक्ष आहे. बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसच्या दडपशाहीला बाजूला सारून निर्भीडपणे मत द्यावे,' असे अध्यक्ष अमित शाह यांनी कोलकाता येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
'बांग्लादेशातून भारतात येणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि ख्रिश्चन निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, असे भाजपने आपल्या 'संकल्प पत्र' या जाहीरनाम्यात स्पष्टपणे सांगितले आहे,' याचा पुनरुच्चार शाह यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. 'दोन टप्प्यातील निवडणुकांनंतरच ममता दीदींना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतोय त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये यंदा परिवर्तन होणारच,' असे ते म्हणाले.